
मुंबई : नव्या वर्षाचे स्वागत करा, कोरोनाचे नाही, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अशा दोन दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जाहीर केली आहे. राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
३१ डिसेंबर आणि १ जानेवारीसंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शक्यतो घरीच राहून सरत्या वर्षाला निरोप, नववर्षाचे स्वागत करावे. दिवसा संचारबंदी नसली तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी शक्यतो बाहेर पडू नये. घरीच साधेपणाने नववर्षाचे स्वागत करावे. ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारी, बागेत, रस्त्यांवर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
मास्क आणि सॅनेटायझर्सचा वापर न विसरता करावा. मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये गर्दी न करता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी. ६० वर्षांवरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. फटाक्यांची आतिषबाजी करू नये. ध्वनिप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबर आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी केल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला