
मुंबई :- ‘पहले मंदिर फिर सरकार’ असे म्हणणाऱ्यांची भाषा सरकार आल्यानंतर बदलली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात, राम मंदिर राजकारणापासून दूर ठेवा. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्याच्या मुद्द्यावरही ते टीका करत आहेत. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा केली जाते आहे, खंडणी नव्हे; असे मला संजय राऊत याना सांगायचे आहे, असा टोमणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मारला.
आपण म्हणजे लोक असा आव कोणी आणू नये; कारण आपण म्हणजे लोक नाही, मुंबईकर नाही व महाराष्ट्रही नाही. आधी या भ्रमातून तुम्ही बाहेर या. शिवसेनेने हिंदुत्व सोडल्यामुळेच संजय राऊत असे बोलत आहेत. वर्गणी आणि शिवसेना यांचा संबंध फार जुना आहे. शिवसेनेचे अनेक सामाजिक उपक्रम, कार्यक्रम या वर्गणीच्या माध्यमातून व्हायचे. मुंबई व राज्यातील शिवसेनेच्या अनेक शाखाही याच वर्गणीतून निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वर्गणी हे काय प्रकरण असे म्हणणाऱ्या राऊतांचे वक्तव्य म्हणजे ‘येड्याचे सोंग घेऊन पेडगावला जाण्यासारखे आहे’, असे दरेकर म्हणाले.
राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटीची वर्गणी काहींनी जाहीर केली; पण त्यांनी दिली का नाही, ते माहीत नाही. स्वयंसेवकांची नियुक्ती कोण करते, असा सवालही राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांना माझा सवाल आहे की, शिवसैनिकांची नियुक्ती कोण करते? त्यांची नियुक्ती कोणी करत नाही, सामाजिक बांधिलकीतून काम करणारा व पक्षाची विचारधारा पुढे नेणारा तो शिवसैनिक असतो. स्वयंसेवकाचीही नियुक्ती होत नसते. स्वयंसेवक हा राष्ट्रभक्तीचा एक आविष्कार आहे. देशभक्तीसाठी उत्स्फूर्त काम करणारा स्वयंसेवक असतो, असे दरेकर म्हणालेत.
ही बातमी पण वाचा : अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? शिवसेनेचा भाजपला सवाल
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला