
सिंधुदुर्ग :- राणे कुटुंब आणि शिवसेना यांच्यातील टोकाचा वाद, टीका महाराष्ट्राने पाहिली आहे. एकीकडे राणे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर टोकाची टाका करतात तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आदर असल्याचेही सांगत असतात. आताही सिंधुदुर्ग विमानतलाच्या मुद्द्यावरून शिवसेना – राणेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
झाले असे की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले त्याचवेळी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केलेली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये’, असे नमूद करतानाच ‘ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही’, अशी तोफ कुडाळचे आमदार आणि शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख वैभव नाईक (Vaibhav naik) यांनी डागली आहे. त्यामुळे विमानतळावरून सिंधुदुर्गात राणे विरुद्ध शिवसेना (Shivsena) यांच्यात वेगळाच वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या २६ जानेवारी रोजी होणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. याच विषयावरून आमदार वैभव नाईक आणि नितेश राणे या जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये ट्वीटर वॉर सुरू झाले आहे. त्यातून या विषयाला राजकीय रंग आला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे. ‘नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.
म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” हे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे!!’, असे ट्वीट नितेश यांनी केले होते. या ट्वीटनंतर वैभव नाईक यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच नितेश यांच्यावर निशाणा साधला आहे.
गद्दार राणेंना बाळासाहेब ठाकरे यांचे नावही घेण्याचा अधिकार नाही, असे सांगताना विमानतळाच्या नामकरणाची चिंता राणेंनी करू नये, त्यासाठी शिवसेना पक्ष सक्षम आहे, असे वैभव नाईक यांनी ठणकावले. राणे यांची राजकीय अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे म्हणून केवळ श्रेय घ्यायला राणे पुढे सरसावले आहेत. मात्र, सिंधुदुर्गवासीय राणेंना ओळखून आहेत. राणे शिवसेना संपवायला निघाले होते पण, शिवसैनिकांनी त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले आणि पुन्हा जिल्ह्यात शिवसेना फोफावली, असेही आमदार वैभव नाईक म्हणाले. नाईक यांच्या या टीकेवर नितेश यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
राऊतांकडू नितेश यांच्या भूमिकेचे स्वागत –
एकीकडे वैभव नाईक यांनी नितेश यांचा समाचार घेतला असताना खासदार आणि शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी मात्र नितेश राणे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे व यापूर्वी अनेक शिवसैनिकांनी ही मागणी केली असल्याचे म्हटले आहे. या विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्याची मागणीही झाली असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला