
बॉलिवूडमध्ये (Bollywood) अक्षयकुमार यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो. स्वतःला फिट ठेवण्यासाठी तो वेळ काढत असतो. केवळ यशस्वीच नाही तर कोणत्याही व्यसनापासून दूर असलेला आणि पार्ट्यांना न जाता रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठून कामाला लागणारा एकमेव कलाकार आहे. त्याच्या या सवयीचा त्याच्यासोबत काम करणाऱ्या बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना त्रास होतो. जर कलाकारांना इतका त्रास होत असेल तर त्याच्या मुलांना त्याचा किती त्रास होत असेल असा प्रश्न मनात येतो. अक्षय बिझी असतानाही स्वतःच्या मुलांमध्येही चांगले गुण यावेत म्हणून अनेक गोष्टी करतो आणि त्याच्या मुलांना ते आवडतेही.
अक्षय हा नितारा आणि आरव या मुलांसोबत पावसाळ्यात आवर्जून वॉकला जातो. पावसानंतर पर्यावरणात, वातावरणात खूप बदल झालेला असतो. निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. आपल्या मुलांना तो निसर्गाचे हे सौंदर्य दाखवण्यास आवर्जून घेऊन जातो आणि त्यांना पर्यावरणाचे महत्त्वही समजावून सांगतो. नितारा अजून लहान आहे; पण तिला तो सगळे शिकवण्याचा प्रयत्न करतो. निताराला त्याने वाचनाची आवड लावली असून रामायणापासून फँटसीपर्यंतच्या कथा तिला तो वाचायला देतो. एवढेच नव्हे तर तो निताराला वेगवेगळ्या गोष्टीही सांगतो. अक्षयने दोन्ही मुलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे; पण त्या स्वातंत्र्यावर त्याने लक्षही ठेवलेले आहे.
पत्नी ट्विंकल (Twinkle Khanna) जेव्हा मुंबईबाहेर असते तेव्हा अक्षय एकटा दोन्ही मुलांना सांभाळतो. तो शूटिंग लवकर आटोपून घरी येतो आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतो. दिवसभर त्यांनी काय केले याची माहिती घेतो. कुटुंबासमवेतच जेवण करण्याचा नियम अक्षयने केला असून तो त्याचे पुरेपूर पालन करतो. मुलांना तो जास्त पॉकेटमनीही देत नाही. मुलांना पैशाची किंमत कळावी याकडेही तो आवर्जून लक्ष देतो.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला