
रत्नागिरी/प्रतिनिधी : लॉकडाउनच्या सुरवातीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोकण रेल्वेने गेल्या २० दिवसात ५१ श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून तब्बल ६८ ७५९ कामगारांना देशाच्या विविध भागात पोहोचवले आहे . या वीस दिवसात महाराष्ट्रातून १३ ट्रेनच्या माध्यमातून १५६७७ कामगार आणि कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचवण्याचे काम कोकण रेल्वेने केले आहे .
लॉक डाऊन सुरु झाल्यानंतर विविध भागात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला . अचानक आलेल्या या संकटाच्या काळात कोकण रेल्वेने मालगाडींची वाहतूक सुरु ठेवत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत निर्माण होणारी टंचाई टाळण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर आवश्यक असणाऱ्या खताचा पुरवठा या तिन्ही राज्यांच्या विविध भागांना कोकण रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आला. गेल्या वीस दिवसापासून कोकण रेल्वे कामगार आणि त्यांच्या अडकलेल्या कुटुंबियांना विविध राज्यात पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम नियोजनबद्ध रीतीने करते आहे .
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील लॉकडाऊन पासून विविध राज्याचे हजारो कामगार आपल्या राज्यात परतण्यासाठी इच्छूक होते . रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यातील श्रमिकांकरिता खास ट्रेन सोडण्यात आल्या. महाराष्ट्रातून सोडण्यात आलेल्या या १३ श्रमिक स्पेशल ट्रेनमधून १५६७७ श्रमिक आणि त्याचे कुटुंबीय रवाना झाले. रत्नागिरी सिंधुदुर्गातून उत्तरप्रदेशला तीन ट्रेन मधून ४०१६, बिहारला दोन ट्रेन च्या माध्यमातून २६४३, कर्नाटक मध्ये तीन ट्रेन च्या माध्यमातून ३६८० ,झारखंड येथे तीन ट्रेन च्या माध्यमातून ३५०१, मध्यप्रदेशला एक ट्रेन च्या माध्यमातून ११६४ तर राजस्थानला एक ट्रेन च्या माध्यमातून ६७३ कामगार रवाना झाले. परत जाऊ इच्छिणा-या कामगारांना त्यांच्या वास्तव्य स्थानापासून रेल्वे स्थानाकापर्यंत आणणे, social distancing चे भान बाळगून त्यांना गाडीमध्ये बसवण्या पासून ते मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्यापर्यंतची जेवणाची व पिण्याच्या स्वछ पाण्याची सोय करणे या एकंदरीतच सर्व व्यवस्थेकरिता कोकण रेल्वे व रत्नागिरी-सिंधुदुर्गातील जिल्हा प्रशासन यंत्रणांनी उत्तम समन्वय राखून काम केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला