
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार आहे. या बाबतचा आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने काढला. यावरून आता भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) टीकास्त्र सोडले आहे.
“गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी चांदीवाल चौकशी समिती स्थापन करून राज्य सरकारने १ एप्रिलच्या आधीच जनतेला अक्षरश: एप्रिल फूल बनवले आहे.” अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला.
“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्राला बरेच दिवस उलटून गेले, तरीही सरकार ढिम्मच होते. मात्र, कोर्टात याचिकेची सुनावणी होणार, हे दिसल्यानंतर राज्य सरकारने बुधवारी कैलास चांदीवाल समिती स्थापन केली. ही समिती चौकशी आयोग अधिनियम, १९५२ अंतर्गत नेमलेली नाही. त्यामुळे या समितीला कोणालाही नोटीस बजावण्याचा अधिकार नाही. तसेच समितीकडून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावल्यावर उपस्थित राहणे बंधनकारक नसेल. त्यामुळे ही समिती म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून एप्रिल फूल बनवण्याचा प्रकार आहे.” अशी टीका उपाध्ये यांनी केली.
हवा तसा अहवाल तयार करून घेण्याची शक्यता
“लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा गृहमंत्र्यांच्या अखत्यारित येतो. असे असताना या विभागाकडे परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सोपवली, तर ती निःष्पक्ष असेल याची अजिबात खात्री नाही. ज्याप्रमाणे महावसूली सरकारने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडून फोन टॅपिंगप्रकरणाचा अहवाल पाहिजे तसा तयार करून घेतला. त्याचप्रमाणे आता या चांदीवाल समितीकडूनसुद्धा पाहिजे तसा अहवाल तयार करून घेण्याची अधिक शक्यता आहे.” असेही उपाध्ये यांनी नमूद केले.
शाह आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही उपाध्ये यांनी भाष्य केले. “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या दोन्ही नेत्यांची भेट झाली की नाही याविषयी भाजपाकडून कुठलेच वक्तव्य केलेले नाही. या विषयावर सुरूवातीपासून कोण बोलत आहे व राज्य सरकार किती ठाम आहे. याविषयी वारंवार कोणाला सांगावे लागले? त्यामुळे नक्की कोणाचे पित्त खवळले, हे स्पष्ट आहे.” असेही उपाध्ये म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला