
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांच्यासह ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह ६५ संचालकांना क्लिन चिट देण्यात आली आहे.
यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुश्रीफांना झालं ते झालं अशा आशयाने समज घालत प्रकरणाला अधिक न ताणता आता थांबवावे असेच सांगण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
काय म्हणाले हसन मुश्रीफ?
हसन मुश्रीफ म्हणाले की, मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकाही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांत पाटील यांनी माझं नाव घातलं. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर “ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी उगळणं चांगलं नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
काय आहे प्रकरण ?
महाराष्ट्र को-ऑप बँक ही शिखर बँक आहे. या बँकेच्यावतीने २००५ ते २०१० या काळात मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केलं होतं. हे कर्ज सहकारी साखर कारखाने आणि सहकारी सूत गिरण्या यांना आणि इतर कंपन्या, कारखाने यांना दिलं होतं. हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. मुख्य म्हणजे हे कर्ज राज्यातील अनेक राजकारण्यांच्या कंपन्या, कारखान्यांना दिलं होतं. पुढे हे कर्ज वसूल झालं नाही. त्यामुळे हा एक मोठा गैरव्यवहार आहे, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला