
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी नाणार आणि जैतापूर प्रकल्पाचे एकप्रकारे समर्थन करून खळबळ उडवून दिली. मात्र, या दोन्ही प्रकल्पांना सुरुवातीपासून कट्टर विरोध असलेल्या शिवसेनेने ही साळवी यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
कोकणातील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने सुरुवातीपासूनच दंड थोपटले आहेत. मात्र या प्रकल्पामुळे बाधित झालेल्यांपैकी ९० टक्के लोकांनी आर्थिक मोबदला स्वीकारला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे असे विधान आमदार साळवी यांनी केले. तसेच नाणार येथील तेलशुद्धिकरण प्रकल्पास स्थानिकांचा विरोध मावळला तर या प्रकल्पाच्या उभारणीसाठी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पुढाकार घेईल असेही साळवी म्हणाले. साळवी यांचे हे विधान वैयक्तिक आहे आणि त्यांच्या विधानाला मुख्यमंत्री व शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मान्यता नाही असे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar ) यांनी माध्यमांना सांगितले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पातील सुमारे ९० टक्के प्रकल्पग्रस्तांनी शासनाने दिलेला मोबदला स्वीकारला आहे. प्रकल्पग्रस्त पाच गावांमधील १ हजार ८४५ कुटुंबांना १३ कोटी ६५ लाख रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला