
मुंबई : पुण्यात शनिवारी (30 जानेवारी) झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणादरम्यान शार्जील उस्मान म्हणाला होता की, ‘आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे’. यावरून भाजपासह हिंदू संघटनांनी शार्जील उस्मानी ( sharjeel usmani) याच्या विरोधात पोलिसात तक्रारी दिल्या असून, त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माहिती देत सांगितले की, शार्जील सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु.
त्यांनी याबाबत माहिती दिली की, पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु.
शार्जील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलिस स्थानकात 153 अ कलमाअंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथं भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी असणाऱ्या प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात तक्रार दिली होती. ज्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला