
नागपूर :- राज्यातील पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात १२ हजार ५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच १२ हजार ५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
ते सोमवारी नागपुरात (Nagpur) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत. गृह विभागाने २०१९ मध्ये पोलीस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलीस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या निर्णयाला मराठा संघटना आणि नेत्यांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात येत आहे; पण आता अनिल देशमुख यांच्या वक्तव्यामुळे गृह खाते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.