
रत्नागिरी : अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत संदिग्धता संपवून परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी रत्नागिरी भाजपा युवा मोर्चाने केली आहे.कोरोना संकटामुळे अनेक परीक्षा रद्द झाल्या मात्र अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत संदिग्धता आहे. परिक्षा कधी होणार? होणार की नाही? याबाबत विद्यार्थी साशंक आहेत. या साशंकतेचा अस्थैर्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर म्हणजे एकप्रकारे करियरवर होणार आहे.
संबधित यंत्रणेने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ न करता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सर्वकष विचार करून परिक्षांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे, ज्यामुळे अस्थैर्य संपून विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. विद्यापीठे परीक्षा घ्यायला तयार आहेत असे वाचनात येते.
तरी राज्यशासनाचा नेमका विचार काय? याबाबत गोंधळ आहे. राज्यपाल महोदयांनी लक्ष घालत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याची वृत्ते आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून परीक्षा घेणे आणि आपापल्या मेरीटनुसार विद्यार्थ्यांना स्पर्धेची पूर्ण संधी मिळणे हेच योग्य ठरेल. अन्यथा परीक्षा न देता पासिंग सर्टिफिकेट पुढील स्पर्धात्मक जगतात मोठा अडसर होऊन बसेल.
परीक्षा रद्द करून लोकप्रिय होता येईल पण भविष्यात विद्यार्थ्याचे होणारे नुकसान फार मोठे असेल याची जाणीव ठेवत अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत संदिग्धता संपवून परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री विक्रम जैन व सरचिटणीस श्री.प्रवीण देसाई यांनी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला