
- रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात – तृप्ती देसाई
मुंबई :राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा (Renu Sharma) यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. रेणू शर्मांनी तक्रार मागे घेतल्याने विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठी हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यास सुरुवात झाली. मात्र रेणू शर्मा आणि तिच्या वकिलावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनादेखील धमक्या देणे, ट्रोल करणे, असे प्रकार झाले. या दबावाखाली रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्यावी लागली, असा दावा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी फेसबुकद्वारे केला आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या की, जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री तसेच सरकारमध्ये असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, तुम्ही जर हिंमतीने पोलीस ठाण्यात गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही, असा संदेश सध्या राज्यभर या प्रकरणातून जात आहे. तसेच यावरूनच नेमकी मानसिकता आपल्या राज्यात काय आहे, हे लक्षात दिसून येते, असं तृप्ती देसाई यांनी सांगितलं.
त्याचप्रमाणे रेणू शर्मा यांनी माघार घेतल्यामुळे आपण जिंकलो असे जर वाटत असेल तर धनंजय मुंडे तुम्ही नक्कीच आमच्या मनातून कायमचे उतरलात, असंही तृप्ती देसाई यांनी व्हिडिओद्वारे म्हटलं आहे. तृप्ती देसाईंच्या या पोस्टवर नेटक-यांनीही त्यांना तोडीस तोड उत्तर देत प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मुळात वीस-वीस वर्षे बलात्कार होतच नसतो. डिल फसली की तो बलात्कार ठरतो, असे मत नेटक-यांनी व्यक्त केले आहे.