
कसोटी क्रिकेटमध्ये 144 वर्षात आतापर्यंत 2400 च्या वर सामने झाले आहेत आणि त्यात 8750 डाव खेळले गेले आहेत. त्यात 71 हजार 800 च्यावर विकेट निघाल्या आहेत. 1804 गोलंदाजांनी किमान एक तरी विकेट काढली आहे पण या 1804 गोलंदाजांत रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा एकटाच वेगळा आहे. तो यासाठी की कसोटी सामन्याच्या एका डावात सर्वात पहिल्या चेंडूवर आणि डावातील अखेरच्या चेंडूवर विकेट काढणारा तो एकमेव गोलंदाज ठरला आहे. याप्रकारे त्याने ही ‘फर्स्ट टू लास्ट’ (First to Last Wickets) अशी एकमेवाद्वितीय कामगिरी केली आहे.
ज्यांनी आठशे- सातशे विकेट काढल्या आहेत आणि ज्यांनी किमान एक तरी विकेट काढली आहे अशा कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी जमलेली नाही.
आता हे सर्वांना माहितच झालेय की, इंग्लंडविरुध्दच्या चेन्नई कसोटीत (India Vs. England, Chennai). अश्विनने सोमवारी डावाच्या सर्वात पहिल्या चेंडूवर रोरी बर्नस् याला बाद केले होते आणि इंग्लंडचा हा डाव त्यानेच जेम्स अँडरसनला बाद करुन 178 धावांवर संपवला होता. याप्रकारे डावातील पहिली आणि शेवटची विकेट अश्विननेच काढली पण त्यात विशेष हे की डावातील सर्वात पहिल्या आणि अगदी शेवटच्या चेंडूवर विकेट त्याच्या नावावर लागली.
कसोटी डावातील सर्वात पहिल्या चेंडूवर गडी बाद करणारा तो केवळ तिसराच आणि गेल्या 114 वर्षातील पहिलाच फिरकीपटू ठरलाच होता पण अँडरसनच्या विकेटने त्याला एकदम स्पेशल, एकदम वेगळा गोलंदाज ठरवला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला