
मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, अशी याचिका उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल केली आहे. आज या याचिवकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
परमबीरांच्या या याचिकेवर ३१ मार्चला सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची चांगलीच खरजपट्टी काढली होती. तसेच राज्य सरकार आणि अन्य याचिकाकर्ते यांच्यासोबत पोलीस प्रशासनाचीही न्यायालयाने चांगलीच कानउघडणी केली होती. केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना याप्रकरणी चौकशी करण्यास तयार असल्याचे कोर्टाला सांगितले होते. आता ही चौकशी सीबीआय किंवा ईडी कोणाकडून करायची याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले होते.
गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दर महिन्यात १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का? असा सवाल परमबीर सिंग यांना करत हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप भासत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले होते. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितले, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने म्हटले होते. मुंबई पोलीस आयुक्त नात्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करणे, ही तुमचीच जबाबदारी होती. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, अशा शब्दात न्यायालायने परमबीर सिंग यांना खडे बोल सुनावले होते. तुमचे वरीष्ठ जरी कायदा मोडत असतील, तरी त्याची तक्रार देऊन गुन्हा दाखल करणे ही तुमचीच जबाबदारी आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. आता या आरोपांच्या चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यात या प्रकरणाचा अहवाल देणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला