
बारामती : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट पुन्हा दाट होऊ लागले आहे. नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. अन्यथा नाईलाजाने पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.
बारामती सहकारी बँकेच्या सभेमध्ये पवार बोलले की, “कोरोना पळून गेल्यासारखे लोक वागत आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर न करणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे, नियमांचे पालन न करणे आदी घटना घडत आहेत. एकदा कोरोना झाला की पुन्हा होणार नाही या भ्रमात राहू नका. दोन, तीनदा कोरोना झाल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. जानेवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाला हरवायचे असेल तर, नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यापुढे कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.”
बारामतीमध्ये पवार यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना केल्या. रविवारी पुण्यात होणाऱ्या बैठकीमध्ये दंडाची रचना ठरवणार आहे. “कारवाईची वेळ येऊ देऊ नका. नियमांचे पालन करा. राज्य सरकार उपाययोजना करत आहे. आपलीदेखील जबाबदारी ओळखा.” असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला