
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चांगलीच गाजत होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नाही, असे स्पष्ट होत आहे. या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याची माहिती दिली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल शुक्रवारी, २६ मार्च रोजी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अहमदाबादेत आले. हा विवाह सोहळा शनिवारी, २७ मार्च रोजी होता.
मात्र, एक दिवसापूर्वी अदानी परिवारातील विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दोन्ही नेते अहमदाबादमध्ये आले. पवार आणि पटेल दोघेही अहमदाबादेत असतानाच अमित शहा हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मात्र, पवार आणि पटेल यांनी शहा यांची भेट घेतलीच नाही. या तिघांमध्ये भेट झाल्याची चर्चा रविवारी प्रसारमाध्यमांमध्ये चांगलीच गाजली.
ही अफवा आहे : नवाब मलिक
शरद पवार आणि अमित शहा यांच्यात कोणतीही भेट झालेली नाही. ही निव्वळ अफवा आहे. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी सायंकाळी स्पष्ट केले. यासंदर्भातील ज्या बातम्या पसरवण्यात आल्या त्या खोट्या आहेत. कोणतीही भेट झालेली नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम
रविवारी अमित शहा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात.” असे सूचक विधान करत संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न केला. प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शहा यांनी दावा केला की, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी होण्याची शक्यता आहे.
योग्य वेळी उघड होईल
शरद पवार यांनी या वृत्ताचे खंडन का नाही केले, असे विचारले असता “योग्य वेळी हे सर्व उघड होईल. पवारसाहेबांची ती सवय नाही. ते योग्य वेळेची निवड स्वत:च करतात.” असे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध असलेल्या सूत्रांनी स्पष्ट केले.
केवळ कल्पनारंजन – उष्मा मल्ल
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शहा यांची भेट घेतली, हे केवळ कल्पनारंजन आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. पवार आणि पटेल काही संस्थांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अहमदाबादला आले होते. योगायोगाने अमित शहा हेही शहरात होते. मात्र, त्यांची भेटच झाली नाही. त्यामुळे बैठकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. या तिघांमध्ये बैठक झाली आणि सरकार बनविण्याची चर्चा झाली यात काही तथ्य नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला