
नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत ‘जे झालं ते गंगेला न्हाल’ असे समजून पुन्हा कार्यकर्त्यांनी नव्या दमाने पक्ष कार्यासाठी लागावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी अनिल गोटे यांनी कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी भगवती लॉन्स येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षाशी प्रामाणिक राहण्याच्या निर्धार केला.
मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अनिल गोटे म्हणाले, कार्यकर्त्यांनी विरोधाभास सोडून समाजासाठी कार्य करावे. पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे कुठलाही व्यक्ती काम घेऊन आला तर त्याची निराशा होऊ नये. जोपर्यंत त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत मदत करा. असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या निवडणुकीत पराभव झाला. पराभवाने घाबरून जाऊ नये. मी कार्यकर्त्यांच्या पराभव सहन करेन पण लज्जास्पद पराभव सहन करणार नाही. कार्यकर्त्यांनी घरावर झेंडे लावून वातावरण निर्मिती करून गाव तेथे राष्ट्रवादीचे शाखा उघडण्यात यावी अशा सूचना अनिल गोटे यांनी केल्या.