
कोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील (Sangram Patil) यांच्या पार्थिवावर आज निगवे खालसा येथे पोलीसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil), खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
शहीद जवान संग्राम पाटील यांचे पार्थिव आज सकाळी 6.30 च्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात येत असताना, या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुर्तफा रांगोळी काढण्यात आली होती. ठिक-ठिकाणी श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काही काळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. याठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौका- चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फूले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.
पोलीस आणि लष्कराच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर शहीद जवान संग्राम पाटील यांचा मुलगा शौर्य याच्या हस्ते अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अधिकारी, पदाधिकरी त्याचबरोबर लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला