
पुणे :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेना (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपावरुन आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कालच गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक दावा केला आहे. येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार असल्याचे खळबळजनक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी ‘ठाकरे’ सरकारने केलेल्या लॉकडाऊनवरही जोरदार टीका केली. लॉकडाऊनवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी विकेंड लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र पत्रक पूर्ण लॉकडाऊनचं काढण्यात आलं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावरही टीका केली. चौकशीपासून वाचण्यासाठीच अनिल देशमुखांच्या दिल्लीवाऱ्या सुरू झाल्या आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला