
बारामती : एकीकडे सचिन वाझेंच्या अटकेवर कुठलीही प्रतिक्रिया न देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर चांगलेच संतापले. राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मंजुरी देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी बघितला नाही. मात्र हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी घडवून आणला, ही दुर्दैवाची बाब आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना लगावला आहे.
बारामती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस झाल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोखून धरल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांच्याकडून करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्य सरकारला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे, अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना पवार म्हणाले की, आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खलिस्तानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार. शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तसेच संसद देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात नक्की उमटेल. सध्या शेतकरी वर्गाची स्थिती अत्यंत नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला