
पुणे : यंदाच्या वर्षी अगदी वेळेवर थंडीची चाहूल लागली. मात्र, दर १५ दिवसांनी वातावरणातील बदलामुळे थंडी गायब होऊन उष्मा वाढला. गेल्या दीड महिन्यात आता तिसऱ्यांदा थंडी गायब झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ढगाळ वातावरण आहे.
पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने काढता पाय घेतल्यानंतर वातावरणात बदल जाणवू लागला होता. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तुलनेत सरासरी सहा ते आठ अंशांनी पारा घसरल्याने यंदा कडक हिवाळ्याचा अनुभव आला. मात्र, त्यानंतर आठच दिवसांत तापमानात एकदम बदल झाला.
त्यावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन आंध्रप्रदेश, तेलंगणासह राज्यात बाष्पाचा पुरवठा झाला. त्यामुळे काही भागांत पाऊस झाला. परिणामी महाराष्ट्रातील तापमानात लक्षणीयरीत्या वाढ झाली. पुन्हा हवेत गारठा वाढला. परत एकदा ‘निवार’ या चक्रीवादळामुळे मध्य भारतातील वातावरण बदलले. आठ दिवस ढगाळ वातावरण राहिले. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याचा सरासरी पारा २४ ते १६ अंशाच्या दरम्यान राहिला.
मात्र मागील दोन दिवसांपासून पुन्हा ढगाळ वातावरण आहे. कमाल २८ तर किमान २२ अंश सेल्सिअस तापमान आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम असून काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला