
नवी दिल्ली :- नव्या कृषी कायद्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोदी (PM Narendra Modi) सरकारवर वारंवार टीका केली आहे. पवार यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे मंजूर करून घेतले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही.’ असा टोला पवार यांनी मोदी सरकारला लगावला.
ते पीटीआयशी बोलत होते. दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. उद्या पुन्हा एकदा सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक होणार आहे. याआधी आज शरद पवार यांनी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्याच्या बैठकीत कोणताही तोडगा सरकारने काढला नाही.
तर सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावून, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी हमी शरद पवार यांनी दिल्याचं आंदोलक शेतकऱ्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातीलही काही शेतकरी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत. त्यापैकी काही शेतकरी आज पवारांना दिल्लीत भेटले.
ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देऊ ; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिली हमी
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला