
मुंबई: भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या वर्षी कार्यकर्त्यांना साद घालणारी एक पोस्ट फेसबुकवर टाकली होती. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यानंतर आता त्यांची बहीण आणि भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनीही एक पोस्ट फेसबुकवर शेअर करत कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
फेसबुक पोस्टमध्ये प्रीतम मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाष्य केले आहे. तर येत्या२७ जानेवारीला पकंजा मुंडे यांनी पाणी प्रश्नावर लढा उभारण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. याची माहिती देत त्यांनी औरंगाबादला येण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. यावेळी पंकजा मुंडे एकदिवसायी लाक्षणिक उपोषण पुकारणार आहेत. त्यांच्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत. मराठवाडा वॉटर ग्रीड अंमलबजावणी, मराठवाड्याच्या हक्काचे पाणी, जलसंधारण यांसारख्या इतर मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारले जाणार आहे
प्रीतम मुंडेची फेसबुक पोस्ट :
नमस्कार..
मागील अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी,सामान्य जनता निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत दुष्काळाचा सामना करत आहे.पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी बांधव पाण्याअभावी अडचणीत आले आहेत.एकीकडे नैसर्गिक संकटांना तोंड देत असतानाच दूसरीकडे त्यामुळे उद्भवलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना मराठवाडयातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
या दुहेरी संकटांवर मात करण्यासाठी व अशा परिस्थितीतीवर कायम स्वरूपीच्या उपाय योजना करण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे, पाण्याचे संवर्धन अशा अनेक शाश्वत स्वरूपाच्या उपाय योजना मराठवाड्यात यशस्वीपणे राबविल्या आहेत. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्वाकांक्षी योजना देखील पंकजाताईंच्या पाठपुराव्याने मागील सरकारने मंजूर केली होती, तिची अंमलबजावणी करणे, त्याच बरोबर मराठवाड्याच्या हक्काचे पाणी,जलसंधारण,पाण्याचे संवर्धन,पिण्याचे पाणी या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मा.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात सोमवार दि.२७ जानेवारी रोजी सकाळी ठीक १०.वाजता औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदती ठेवायची असेल तर मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. मा.पंकजाताई मुंडे यांनी आपल्यासाठी,आपल्या शेतकरी बांधवांसाठी,आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी,आपल्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारला आहे.आपण ही या लढ्यात सहभागी होऊन मराठवाड्याच्या पाणी प्रश्नांसाठी लढा उभारणाऱ्या रनरागिणीला पाठींबा देऊ या !!
येताय ना मग…आम्ही येत आहोत…तुम्ही पण या !!